कल्याण-डोंबिवली : पावसाळा सुरू असला तरी धरण क्षेत्रातील पाणीसाठ्याची चिंताजनक स्थिती लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संभाव्य पाणीटंचाईचा सामना टाळण्यासाठी शहरातील पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा अपेक्षेप्रमाणे वाढलेला नसून आगामी काळात पावसाचा वेग कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) यंदा एल निनो आणि आयओडी (Indian Ocean Dipole) यांच्या प्रभावामुळे पावसाळा उशिरा आणि अनियमित राहू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंतचा पाणीसाठा पुरेसा राहावा, यासाठी KDMC प्रशासनाने पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिकेने नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले असून, दैनंदिन वापरात आवश्यक तेवढेच पाणी वापरण्याची विनंती केली आहे. आगामी काही आठवड्यांत पावसाची परिस्थिती आणि धरणांमधील पाणीसाठा याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याच्या वेळेत किंवा प्रमाणात बदल होण्याची शक्यता असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


