नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून हा मुद्दा आता थेट विधानसभेतही गाजला आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी शहरातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर सरकारला धारेवर धरत कठोर कारवाईची मागणी केली.
सभागृहात बोलताना ठाकरे यांनी नागपूरमध्ये महिलांविरुद्धचे वाढते गुन्हे, बालगुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, वाहनचोरी आणि भूमाफियांच्या वाढत्या कारवायांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागपूरकरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय गुन्हे अभिलेख ब्युरो (NCRB) च्या २०२४ च्या अहवालाचा दाखला देत ठाकरे यांनी सांगितले की, नागपूरमध्ये ८८ खुनांची नोंद झाली असून देशातील १९ महानगरांमध्ये खुनांच्या प्रमाणात शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही बाब नागपूरसाठी चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.बालगुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. २०२२ मध्ये २१० गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर २०२४ मध्ये हा आकडा २८३ वर पोहोचला. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली असून २०२२ मधील १,२५९ गुन्ह्यांच्या तुलनेत २०२४ मध्ये १,५१३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये नागपूरचा देशातील महानगरांमध्ये सातवा क्रमांक लागतो. बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये पाचवा, लैंगिक छळाच्या घटनांमध्ये तिसरा तर मानवी तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये चौथा क्रमांक असल्याचेही ठाकरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.याशिवाय, २०२६ च्या केवळ पहिल्या पाच महिन्यांतच शहरात ३७ खून आणि तब्बल ७५२ वाहनचोरीच्या घटना नोंदविण्यात आल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले.
नागपूर अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराचे केंद्र बनत चालल्याची बाबही त्यांनी उपस्थित केली. वाढत्या ड्रग्ज तस्करीमुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात येत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. तसेच शासकीय आणि खासगी जमिनींवरील अतिक्रमणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावण्याचे प्रकार आणि भूमाफियांच्या संघटित कारवायांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.या सर्व पार्श्वभूमीवर गुन्हेगारी रोखण्यासाठी शासनाने नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, तसेच अपेक्षित कारवाई करण्यात विलंब का होत आहे, याचे स्पष्ट उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.नागपूरकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न केवळ चर्चेचा विषय राहू नये. गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर आणि परिणामकारक कारवाईची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.


