पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येण्याची शक्यता आहे. शहरातील पाणी कपात सुरू ठेवायची की ती मागे घ्यायची, याबाबत आज पुणे महापालिका महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. अलीकडील पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, त्यामुळे पाणी कपात हटवली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.
गेल्या ११ दिवसांत जलसंपदा विभागाने खडकवासला धरणातून उजव्या मुठा कालव्यातून सुमारे पाऊण टीएमसी पाणी सोडले. वारीसाठी राखीव ठेवलेले पाणी आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन हा विसर्ग करण्यात आल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, शहरात पाणी कपात सुरू असताना मोठ्या प्रमाणात पाणी कालव्यातून सोडल्याने अनेकांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, सोमवार सकाळपासून मंगळवार सायंकाळपर्यंत खडकवासला प्रकल्पात १.१५ टीएमसी नव्या पाण्याची आवक झाली. त्यामुळे चारही धरणांमधील एकूण पाणीसाठा १८.३१ टीएमसी म्हणजेच ६२.८० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. हा साठा शहराच्या वार्षिक पाणीपुरवठ्यासाठी समाधानकारक मानला जात असून, पाणी कपात हटवण्याबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.
यापूर्वी धरणांतील साठा कमी झाल्याने शहरात एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर वारीचा काळ आणि ग्रामीण भागातील वाढती मागणी लक्षात घेऊन कालव्यातील विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय २२ जुलैपर्यंत स्थगित केला होता. आता पावसाने पुन्हा जोर धरल्यामुळे आणि धरणांमध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानेही पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने धरणे आणखी भरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्याचा धरणांतील पाणीसाठा (टीएमसी):
खडकवासला – १.२८ (६४.७५%)
पानशेत – ७.२७ (६८.२५%)
वरसगाव – ८.०७ (६२.९७%)
टेमघर – १.६९ (४५.५०%)
एकूण – १८.३१ टीएमसी (६२.८०%)
गेल्या वर्षी याच कालावधीत धरणांमध्ये २३.०३ टीएमसी (७९.०२%) पाणीसाठा होता.


