मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा मुंबईत जोरदार हजेरी लावली असून त्याचा फटका आता थेट रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यानची लोकल सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे सेवांवरही झाला आहे. विशेषतः उमरगाव-घोलवड विभागात रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विरार-डहाणू लोकल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिस्थितीमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम झाला आहे. काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत अपडेटची माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या गाड्या रद्द
२३ जुलै – ट्रेन क्र. 59039 विरार–वलसाड
२३ जुलै – ट्रेन क्र. 59046 विरार–वलसाड
२३ जुलै – ट्रेन क्र. 09036 उधना–वांद्रे टर्मिनस
२४ जुलै – ट्रेन क्र. 09035 वांद्रे टर्मिनस–उधना
२८ जुलै – ट्रेन क्र. 19102 सुरत–विरार
२८ जुलै – ट्रेन क्र. 69173 विरार–डहाणू रोड
सततच्या पावसामुळे परिस्थितीवर रेल्वे प्रशासनाचे लक्ष असून पाणी ओसरल्यानंतरच सेवा पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.


