मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागांत झाडे कोसळणे, दरडी कोसळणे आणि इमारतींच्या दुर्घटनांच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
विधानसभेत परिस्थितीची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हवामान विभागाच्या अंदाजानुसार दुपारनंतर मुंबईत वाऱ्याचा वेग ताशी ८० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सोमवारी मुंबईत ताशी सुमारे ५० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. दरवर्षी मुंबईत सरासरी ८०० झाडे कोसळतात, मात्र यंदा एका दिवसातच सुमारे ३५० झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई-पुणे मार्गावर काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच काल घडलेल्या इमारत दुर्घटनेचा उल्लेख करत संबंधित इमारत प्राथमिक माहितीनुसार बेकायदेशीर असल्याचे समोर आले असून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवल्या असून राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी समुद्रकिनारे, नदीकाठ आणि पर्यटनस्थळांवर जाणे टाळावे, पावसाचा आनंद घेण्यासाठी अनावश्यक बाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


