मुंबई : राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) संदर्भातील नियम आता अधिक कडक झाले आहेत. 30 जूनपर्यंत देण्यात आलेली मुदत संपल्यानंतर शासनाकडून पुढील कोणतीही मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर आजपासून दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांकडून गस्ती पथकांकडून किमान ₹1,000 दंड आकारला जाणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. HSRP नंबर प्लेट नसल्यास केवळ दंडच नव्हे, तर वाहनाशी संबंधित अनेक कामांवरही परिणाम होणार आहे. वाहन हस्तांतरण, पुनर्नोंदणी, पत्ता बदल, वाहनावरील कर्जाची नोंद चढविणे किंवा कमी करणे, वाहनातील बदल आणि इतर आरटीओ सेवा पूर्ण करताना अडचणी येऊ शकतात.
सोलापूर जिल्ह्यातील आकडेवारी पाहता, 1 एप्रिल 2019 पूर्वीची सुमारे 9 लाख वाहने आहेत. त्यापैकी केवळ 2 लाख 70 हजार वाहनांवरच HSRP नंबर प्लेट बसविण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी दिली. HSRP बसविण्यासाठी यापूर्वी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र यावेळी शासनाने मुदत वाढविण्याचा निर्णय घेतलेला नाही. परिवहन विभागाच्या मते, HSRP नंबर प्लेटमुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि अचूकपणे करता येते. चोरीची वाहने शोधणे, अपघातग्रस्त वाहनांची ओळख पटविणे तसेच बनावट किंवा फॅन्सी नंबर प्लेटच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही व्यवस्था उपयुक्त ठरते.


