नवी दिल्ली : मंगळुरू किनाऱ्याजवळ प्रतिकूल हवामानात अडकलेल्या ‘मंजू माथा’ या भारतीय मासेमारी नौकेवरील सहा मच्छीमारांची भारतीय तटरक्षक दलाने (ICG) सोमवारी यशस्वी सुटका केली. अत्यंत खराब हवामान, खवळलेला समुद्र आणि कमी दृश्यमानता अशा आव्हानात्मक परिस्थितीत ही बचावमोहीम पार पाडण्यात आली.
सुरतकल किनाऱ्यापासून सुमारे ३३ नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या मासेमारी नौकेकडून दुपारी सुमारे ४ वाजता व्हीएचएफद्वारे आपत्कालीन संदेश प्राप्त झाला. खराब हवामानामुळे नौकेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून नौकेच्या तळाला नुकसान झाल्याने सहाही मच्छीमारांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची माहिती संदेशातून देण्यात आली होती.
माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाचे आयसीजीएस सचेत (ICGS Sachet) हे जहाज तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर तटरक्षक दलाच्या जवानांनी प्रतिकूल हवामानात वापरता येणाऱ्या रिमोट-ऑपरेटेड लाइफबॉयच्या साहाय्याने बचावकार्य सुरू केले. सायंकाळी सुमारे ६ वाजेपर्यंत सर्व सहा मच्छीमारांची सुखरूप सुटका करण्यात आली.सुटका करण्यात आलेल्या मच्छीमारांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यासाठी आयसीजीएस सचेत हे जहाज न्यू मंगळुरू बंदराकडे रवाना झाले आहे.
या यशस्वी बचावकार्यातून समुद्रातील मानवी जीविताचे संरक्षण करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची तत्परता, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तसेच जवानांचे धैर्य, प्रशिक्षण आणि व्यावसायिक कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


