मुंबई: राज्यात बिश्नोई गँगच्या नावावरून खंडणी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा मुद्दा मंगळवारी विधानसभेत गाजला. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा विषय उपस्थित करत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच बिश्नोई गँग आणि त्यांच्या नेटवर्कविरोधात निर्णायक कारवाई कधी होणार, असा सवाल त्यांनी सरकारला केला.
पिंपरी-चिंचवड येथील एका फर्निचर व्यावसायिकाच्या दुकानावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वीकारल्याचा उल्लेख करत वडेट्टीवार यांनी व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी करण्यात आल्याचे आणि जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचे सभागृहात सांगितले. अशा घटनांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधील तुरुंगात असताना त्याची टोळी महाराष्ट्रात दहशत कशी निर्माण करत आहे, तुरुंगातून किंवा परदेशातून गुन्हेगारी कारवाया कशा सुरू आहेत आणि त्या रोखण्यासाठी पोलिसांनी नेमकी कोणती पावले उचलली आहेत, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.या प्रकरणात १२ आरोपींपैकी केवळ चार जणांना अटक झाली असून आठ आरोपी अद्याप फरार असल्याकडे लक्ष वेधत, घटना घडून सव्वा महिना उलटल्यानंतरही मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात नसल्याची टीका त्यांनी केली.
प्रश्नोत्तराच्या वेळी वडेट्टीवार यांनी सलग घडणाऱ्या धमक्या, गोळीबार आणि हत्यांच्या घटनांचा उल्लेख करत सरकारने व्हीपीएन किंवा आरोपी परदेशात असल्याची कारणे देऊन जबाबदारी झटकू नये, अशी भूमिका मांडली. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारचीच असून शुभम लोणकर आणि बिश्नोई गँगच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, संबंधित गँगने गुन्हे करण्याची नवी पद्धत अवलंबली आहे. धमक्या देऊन भाड्याने गुंडांना व्यापारी किंवा संबंधित व्यक्तींच्या घर, कार्यालय परिसरात गोळीबार करण्यास सांगितले जाते, जेणेकरून भीतीचे वातावरण निर्माण होईल. मात्र अशा भाडोत्री गुंडांवर कारवाई करण्यात आली असून या गँगमध्येही अंतर्गत वर्चस्वाची लढाई सुरू आहे. पोलिसांकडून या संपूर्ण नेटवर्कवर कारवाई सुरू असून त्यांचा बंदोबस्त करण्यात येत असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले.


