पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपास सुरू असतानाच आता वकीलपत्राच्या वादामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मुख्य संशयित सिया गोयल हिचे वकील कोण, यावरून न्यायालयातच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाचा भाऊ साहिल याला तब्बल 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस बजावली आहे.
या प्रकरणात सिया गोयलचे वकीलपत्र आपल्याकडे असल्याचा दावा दोन वेगवेगळ्या वकिलांकडून करण्यात येत होता. अॅड. विपूल दुशिंग यांनी पोलिस ठाण्यात जाऊन सियाची सही घेत वकीलपत्र स्वीकारल्याचे सांगितले होते. दुसरीकडे अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनीही आपणच तिचे वकील असल्याचा दावा केला होता.
सोमवारी (30 जून) सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अॅड. श्रीवास्तव यांनी न्यायालयात युक्तिवाद सुरू केला. मात्र, सियाने न्यायालयासमोर अॅड. आशुतोष श्रीवास्तव नव्हे, तर अॅड. विपूल दुशिंग हेच आपले वकील असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अॅड. श्रीवास्तव यांनी साहिलविरोधात कायदेशीर पाऊल उचलले.व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचा आरोप करत त्यांनी साहिलला 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची नोटीस पाठवली आहे. तसेच 48 तासांच्या आत केलेले आरोप मागे घ्यावेत, सार्वजनिक माफी मागावी आणि भविष्यात असे आरोप करू नयेत, अशी मागणी नोटिशीत करण्यात आली आहे.
दरम्यान, हत्या प्रकरणाच्या तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी न्यायालयाकडे कोठडी वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या पोलिस कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ केली आहे.तपासानुसार, हा कट पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांचा संशय आहे. सीसीटीव्ही आणि एएनपीआर कॅमेऱ्यांपासून बचाव करण्यासाठी आरोपींनी चारचाकीऐवजी जाणीवपूर्वक दुचाकीचा वापर केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित दुचाकीचे न्यायवैद्यक परीक्षण सुरू असून, त्यातून महत्त्वाचे तांत्रिक पुरावे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


