अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद, मंदिर, अर्चक, पुरोहित आयाम आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर संचलित ‘संस्कृती श्रीनिवास कनोरे’ प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या हस्ते वडाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषद मंदिर, अर्चक, पुरोहित आयामाचे विभाग प्रमुख गजेंद्र सोनवणे, जिल्हाप्रमुख श्रीकांत नांदापूरकर, सहप्रमुख हरिभाऊ डोळसे, ज्येष्ठ मार्गदर्शक मिलिंद मोभारकर, शाळेचे चेअरमन जितेंद्र लांडगे, स्वकुळ साळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख विक्रम पाठक, शालेय समितीचे सचिव संजय सागावकर, मनोहर भाकरे, नीरज चांगटे, अभिजीत अष्टेकर, गणेश झिंजे, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना भामरे, शिक्षक बबनभाई शेख, रामदास गर्जे, सुशीलकुमार आंधळे आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख म्हणाले, “वृक्षारोपण हा फक्त पर्यावरणाचा विषय नाही, तर तो आपल्या संस्कृतीचाही भाग आहे. एक झाड लावणे म्हणजे लाखो जीवांना प्राणवायू देणे आहे. विद्यार्थ्यांनी लावलेले हे झाड जतन करण्याची जबाबदारी घ्यावी. हेच खरे राष्ट्रकार्य आहे.”
विभाग प्रमुख गजेंद्र सोनवणे म्हणाले, “विश्व हिंदू परिषदेची स्थापना २९ ऑगस्ट १९६४ रोजी झाली. ‘हिंदू जागा, हिंदू संघटित, हिंदू शक्तिशाली’ या मंत्राने परिषद गेली ६१ वर्षे काम करत आहे. मंदिर, अर्चक, पुरोहित हा आमच्या आयामाचा आत्मा आहे. धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. वड हे अखंडत्वाचे प्रतीक आहे. जसे वडाच्या पारंब्या खोलवर जातात, तसेच हिंदू संस्कृतीची मुळे खोलवर आहेत. प्रत्येक हिंदू कुटुंबाने एक झाड लावून त्याचे संगोपन केले, तर हाच खरा वर्धापन दिन साजरा होईल.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत नांदापूरकर यांनी केले. विश्व हिंदू परिषद धर्म, संस्कृती आणि राष्ट्र या त्रिसूत्रीवर काम करते. स्थापना दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. आभार मुख्याध्यापिका कल्पना भामरे यांनी मानले.


