भंडारा, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : भंडारा डोंगर-जांभवडे, इंदोरी येथे मराठवाडा जनविकास संघ व गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने १ हजार देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कडुलिंब, चिंच, वड, पिंपळ, जांभूळ, आंबा यांसह विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. दोन ते तीन वर्षे व सुमारे पाच फूट उंचीची झाडे यावेळी लावण्यात आली.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती!” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील विचारांचा संदर्भ देत महाराष्ट्र शासन वनश्री पुरस्कारप्राप्त वृक्षमित्र श्री. अरुण भाऊ पवार म्हणाले की, संतांनी वृक्षांना आपले सगे-सोयरे मानले. वारीमध्ये वारकरी संप्रदायाने संतांचे विचार केवळ भजनापुरते मर्यादित न ठेवता वृक्षारोपण व संवर्धनासारख्या सामाजिक उपक्रमांतून प्रत्यक्ष कृतीत आणले आहेत. ते मराठवाडा जनविकास संघ व गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला वृक्षमित्र श्री. अरुण पवार, गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारतीताई चव्हाण, श्री. दिलीप ठोरे, सरपंच शशिकांत शिंदे, वनअधिकारी श्रीमती मंगल दाते, जगन्नाथ नाटक, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद तसेच संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद उपस्थित होते.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे आणि ती जगवणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. या उद्देशाने मराठवाडा जनविकास संघ व गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी देशी वृक्षांचे वृक्षारोपण करून ते १०० टक्के जगविण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रत्येक झाड डोंगर उतारावर व्यवस्थित लावून त्याला आळे केले जाते. तसेच संरक्षणासाठी प्लास्टिक जाळी लावून बांबूच्या साह्याने झाडांना आधार दिला जातो. उन्हाळ्यात टँकरच्या साह्याने पाणी देण्यात येते. वृक्षांची संपूर्ण जबाबदारी संस्थेच्या वतीने घेण्यात येते. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष असून कार्यक्रमाचे आयोजन गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे शहराध्यक्ष बाळासाहेब साळुंके, महमंदशरीफ मुलाणी, डॉ. नंदकुमार धुमाळ, पांडुरंग सुतार व दिनेश पवार यांनी केले.


