देशासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत असून विदर्भातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमानाने 46 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. वाढत्या तापमानामागे हवामान बदल, समुद्राच्या तापमानात होत असलेली सातत्यपूर्ण वाढ आणि पर्यावरणीय असंतुलन ही प्रमुख कारणे असल्याचे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सुभाष टाले यांनी स्पष्ट केले आहे. समुद्र तापल्यामुळे वातावरणातील बदल अधिक तीव्र होत असून भविष्यात भीषण दुष्काळाचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. विदर्भ हा देशाच्या अंतर्गत भागात असल्याने येथे समुद्राचा थंडावा पोहोचत नाही, त्यामुळे जमीन अधिक वेगाने तापते. त्यातच वाढते शहरीकरण, वृक्षतोड, काँक्रीटचे वाढते जंगल आणि “Urban Heat Island” प्रभावामुळे शहरांमधील उष्णता आणखी वाढत आहे. सिमेंटचे रस्ते, उंच इमारती आणि डांबरीकरण दिवसभर उष्णता साठवून रात्रीही वातावरण गरम ठेवत आहेत. पावसाचे अनियमित प्रमाण, जमिनीतील घटलेला ओलावा, वाहनांचे व औद्योगिक प्रदूषण आणि शेतीतील बदल यामुळे हिरवळ कमी होत असून कोरडी जमीन अधिक तापत आहे. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून विदर्भात अभूतपूर्व उष्णतेची परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


