मुंबई : जून महिना संपत आला असतानाही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. महापालिकेच्या ताज्या आकडेवारीनुसार सातही धरणांमध्ये मिळून केवळ १,०८,९६७ दशलक्ष लिटर, म्हणजेच ७.५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणीकपातीची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या वर्षी याच कालावधीत धरणांमध्ये जवळपास ३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा मात्र पावसाने ओढ दिल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. विशेषतः भातसा, तानसा आणि मध्य वैतरणा धरण परिसरात अद्याप १०० मिमी पावसाचाही टप्पा गाठलेला नाही. गेल्या २४ तासांतही या भागात अत्यल्प पाऊस झाल्याने धरणांतील साठ्यात फारशी वाढ झालेली नाही. अप्पर वैतरणा धरणाची स्थिती आणखी चिंताजनक आहे. धरणाची पाणीपातळी किमान मर्यादेखाली गेल्याने उपयुक्त पाणीसाठा सध्या शून्य नोंदवला गेला असून, तेथून आपत्कालीन स्वरूपात पाण्याचा उपसा सुरू आहे. दुसरीकडे, विहार आणि तुळशी तलाव परिसरात तुलनेने चांगला पाऊस झाल्याने तेथील साठ्यात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मुंबईला दररोज सुमारे ३,९०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्याचा मर्यादित साठा लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसांत धरण परिसरात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून, त्याकडेच मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.


