भंडारा : भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनसोड आणि प्रफुल अग्रवाल यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे संपूर्ण चित्र बदलले आहे. त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर आणि दोन अपक्ष उमेदवार यांच्यात थेट तिरंगी सामना रंगणार आहे.काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांच्या माघारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय समीकरणे आणि आरोप-प्रत्यारोप समोर येत होते. या घडामोडींमुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, महायुतीच्या नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव अज्ञात स्थळी ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर आणि निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधींना त्यांच्या जिल्ह्यांकडे रवाना करण्यात येत असल्याचे समजते.काँग्रेसच्या माघारीनंतर आता भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यासमोर दोन अपक्ष उमेदवारांचे आव्हान उभे राहिले असून या तिरंगी लढतीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


