पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा आज महत्त्वपूर्ण निकाल लागणार आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्या शिक्षेबाबतचा निर्णय पुणे जिल्हा सत्र न्यायालय देणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली होती. निष्पाप बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या आरोपाखाली भीमराव कांबळे याला पोलिसांनी तातडीने अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी वैद्यकीय अहवाल, डीएनए नमुने, फॉरेन्सिक तपासणी आणि घटनास्थळावरील वैज्ञानिक पुरावे गोळा केले. या खटल्यात ८० हून अधिक साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट अजय मिसर यांची नियुक्ती केली होती. २४ जून रोजी दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद पूर्ण झाले. सरकारी पक्षाने आरोपीविरोधात वैद्यकीय, वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे भक्कम बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने निकालासाठी आजचा दिवस निश्चित केला.
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके आज या प्रकरणातील अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत. आरोपी दोषी ठरल्यास त्याला फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप सुनावली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून पीडित बालिकेचे कुटुंबीय, सरकारी पक्षाचे वकील आणि संबंधित अधिकारी न्यायालयात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.नसरापूरमधील या घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आंदोलन छेडले होते. फास्ट ट्रॅक पद्धतीने सुनावणी पूर्ण झालेल्या महत्त्वाच्या खटल्यांमध्ये या प्रकरणाची गणना केली जात असून, आजचा निकाल पीडित कुटुंबीयांसाठी आणि समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.


