मुंबई : सणासुदीचे दिवस जवळ येत असतानाच साखरेच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडू लागले आहे. राज्यात यंदा साखरेचे उत्पादन घटल्याने बाजारातील आवक कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम साखरेच्या किमतीवर होत असून, किरकोळ बाजारात साखरेचा दर 50 रुपये प्रतिकिलोच्या पुढे गेला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, कारखान्यांकडून मिळणाऱ्या साखरेच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसून येत आहे. त्यामुळे रोजच्या चहापासून ते सणासुदीच्या गोड पदार्थांपर्यंत साखरेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
सणाआधी दर आणखी वाढण्याची शक्यता
दसरा आणि दिवाळीच्या काळात साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मिठाई, बेकरी उत्पादने, पेये तसेच विविध खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर साखरेचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत सणापूर्वी नवीन साखर बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली नाही, तर दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
एपीएमसीच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरांमध्ये दरमहा सुमारे 40 हजार टन साखरेचा वापर होतो. यातील जवळपास 60 टक्के साखर मिठाई, बेकरी, पेये आणि इतर प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांसाठी वापरली जाते. तर उर्वरित सुमारे 40 टक्के साखर घरगुती वापरासाठी जाते. यामुळे साखरेच्या दरवाढीचा फटका केवळ घरगुती बजेटलाच बसणार नाही, तर मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यताही आहे.
उत्पादन घटल्याचा बाजारावर परिणाम
मागील वर्षी ऑक्टोबर ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सुमारे 38 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा उत्पादनात घट झाल्याने बाजारात साखरेची आवक कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी राहिल्यास आगामी काळात दरवाढीचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.
जानेवारी-जूनमध्ये 35 ते 38 रुपये किलो दर
यंदा 1 जानेवारी ते जूनदरम्यान कारखान्यांमधून मिळणाऱ्या साखरेचा दर सरासरी 35 ते 38 रुपये प्रतिकिलो होता. मात्र, त्यानंतर दरात टप्प्याटप्प्याने वाढ झाली. सध्या कारखान्यांमधील साखरेचा दर 46 ते 48 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. किरकोळ बाजारात अनेक ठिकाणी साखरेचा दर 50 रुपये प्रतिकिलोच्या पुढे गेला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात घरगुती खरेदीपासून मिठाईपर्यंत सर्वच ठिकाणी साखरेच्या वाढत्या किमतीचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.


