पुणे : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात अवघ्या आठ दिवसांत तब्बल १३ टीएमसीची वाढ झाली असून सध्या एकूण जलसाठा १६ टीएमसीवर पोहोचला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या चिंतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सध्या खडकवासला प्रकल्पातील एकूण पाणीसाठा १६ टीएमसी म्हणजेच एकूण क्षमतेच्या ५४.८९ टक्के इतका आहे. मात्र, गेल्या वर्षी याच दिवशी धरणांमध्ये १९.८१ टीएमसी (६७.९७ टक्के) पाणीसाठा होता. त्यामुळे यंदाही सुमारे ३ टीएमसी पाण्याची तूट कायम असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
खडकवासला धरण प्रकल्पातील चारही प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक सातत्याने सुरू आहे. सध्या खडकवासला धरणात १.९६ टीएमसी, पानशेतमध्ये ६.०१ टीएमसी, वरसगावमध्ये ६.७० टीएमसी आणि टेमघर धरणात १.३३ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे येत्या काही दिवसांत जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, धरणातील पाण्याची स्थिती लक्षात घेऊन खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सुरू असलेला पाण्याचा विसर्गही थांबवण्यात आला आहे. काल रात्री १०.३० वाजता ६,२९६ क्युसेक वेगाने सुरू असलेला विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. मात्र, पुढील काळात धरणक्षेत्रातील पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी पाण्याची आवक यानुसार विसर्गाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


