नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) विविध प्राध्यापक संवर्गाच्या चाळणी परीक्षा केवळ मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील हजारो उमेदवारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथेही परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे संयोजक शंतनू झाडे यांनी शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन करारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. निवेदनानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात क्रमांक ४८/२०२३, ४९/२०२३, ११४/२०२३, ११५/२०२३ आणि १२९/२०२३ अंतर्गत सुमारे ४२ विषयांच्या प्राध्यापक संवर्गाच्या चाळणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, या परीक्षा प्रामुख्याने मुंबई येथेच आयोजित करण्यात आल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील उमेदवारांची मोठी गैरसोय होत आहे.
भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरसह विदर्भातील तसेच मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील उमेदवारांना केवळ एक तासाच्या चाळणी परीक्षेसाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रवास अधिकच कष्टदायक ठरत असून त्यातून आर्थिक, मानसिक आणि शारीरिक ताण सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, अर्ज भरताना आयोगाकडून परीक्षा केंद्राचा पर्यायही मागविण्यात आला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीचे केंद्र निवडण्याची संधी मिळाली नाही. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथेही परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला तातडीने सकारात्मक निर्देश द्यावेत, अशी मागणी भाजयुमो विद्यार्थी आघाडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


