नवी दिल्ली : देशाच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडीत भारताच्या निवडणूक आयोगाने बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांतील रिक्त विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३० जुलै २०२६ रोजी मतदान होणार असून ४ ऑगस्टपर्यंत मतमोजणी आणि निकालाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या घोषणेनंतर संबंधित तीनही राज्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
यावेळी बिहारमधील बांकीपुर, गुजरातमधील मंजलपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. विविध कारणांमुळे या जागा रिक्त झाल्यानंतर त्या भरण्यासाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.आयोगाच्या वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १३ जुलै आहे. १४ जुलै रोजी अर्जांची छाननी केली जाईल, तर १६ जुलै ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. त्यानंतर प्रचाराचा धुरळा उडणार असून ३० जुलै रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
बिहारमधील बांकीपुर विधानसभा मतदारसंघाची जागा आमदार नितीन नवीन यांनी राजीनामा दिल्यानंतर ३० मार्च २०२६ रोजी रिक्त झाली होती. गुजरातमधील मंजलपूर मतदारसंघाचे आमदार योगेशभाई नरनदास पटेल यांच्या २ जून २०२६ रोजी झालेल्या निधनानंतर तेथील जागा रिक्त झाली. तर मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघातील आमदार राजेंद्र भारती यांना अपात्र ठरवण्यात आल्याने २ एप्रिल २०२६ रोजी ती जागा रिक्त झाली. जनप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम ८ तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम १९१ (१)(ई) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती.
निवडणूक आयोगाने संबंधित राज्य सरकारांना आवश्यक अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. रिक्त झालेल्या जागांवर लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी ही पोटनिवडणूक होत असून, आता या तीनही मतदारसंघांमध्ये उमेदवारांची चाचपणी, प्रचाराची तयारी आणि राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


