मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर शनिवारीही कायम राहिला आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज दुपारच्या सत्रात सुटी जाहीर करण्यात आली आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून रस्ते वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान, अतिवृष्टीमुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून त्याला जोडलेल्या लहान नाल्यांनाही पूर आला आहे. त्यामुळे परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचले आहे. सततच्या पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब होत आहे. याचबरोबर दुपारी २.५० वाजता ४.२६ मीटर उंच भरती येणार असल्याने प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगली आहे.परिस्थिती लक्षात घेऊन चेंबूरमधील नूर-ए-इलाही सेवा रस्ता, अंधेरीतील वीरा देसाई रस्ता, महानगरपालिका बाजारपेठ रस्ता, स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, विक्रोळीतील हुमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन आणि परेश पार्क बाजारपेठ परिसरातील काही रस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी या मार्गांवर प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबई महापालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, सखल भाग, समुद्रकिनारे आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
गेल्या २४ तासांत शहरातील अनेक भागांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुढील काही तासही मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


