मुंबईला पूरमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. पंपिंग स्टेशन आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांचे बळकटीकरण करण्यासोबतच पूरप्रवण भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
पावसाच्या काळात पाणी साचण्याच्या समस्या टाळण्यासाठी विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. शहरातील नालेसफाईची कामे जवळपास पूर्ण झाली असून, उर्वरित कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. याशिवाय जलनिस्सारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही भर देण्यात येत असून, संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.


