महाराष्ट्रावर यंदा दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदाच्या मॉन्सून हंगामात महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीच्या केवळ ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून, त्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीवर मोठा परिणाम होऊ शकतो
डॉ. एम. रविचंद्रन आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी सुधारित अंदाज जाहीर केला. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, राज्यासह मॉन्सून कोअर झोनमध्ये ९४ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा तुटवडा जाणवू शकतो. मात्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही तुरळक भागांमध्ये सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यापूर्वी हवामान विभागाने पहिल्या दीर्घकालीन अंदाजात देशभरात सरासरीच्या ९२ टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, नव्या अंदाजात पर्जन्यमान आणखी कमी राहण्याची शक्यता दर्शविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, १९७१ ते २०२० या कालावधीत देशातील मॉन्सून पावसाची सरासरी ८६८.६ मिलिमीटर इतकी आहे. यामध्ये सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सर्वसाधारण मानला जातो. मात्र, यंदा पावसाच्या प्रमाणात तुटवडा राहण्याची शक्यता तब्बल ६० टक्के असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
याउलट सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता केवळ २ टक्के आहे. कमी पावसाच्या या अंदाजामुळे राज्यातील शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. खरीप हंगामातील पेरणी, पिकांची वाढ आणि जलसाठ्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाच्या स्थितीकडे शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.


