ठाणे : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने विशेष नियोजन केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी २० ते ३० जुलै या कालावधीत पंढरपूरसाठी एकूण १६ जादा एसटी बसफेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. या गर्दीचा विचार करून प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित व्हावा, यासाठी एसटी प्रशासनाने विविध मार्गांवर अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून दिली आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, शहापूर, मुरबाड, वाडा तसेच बोरीवली येथून या विशेष बसफेऱ्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये बोरीवली (नॅन्सी कॉलनी)-सायन-पंढरपूर, ठाणे-फलटण-पंढरपूर, भिवंडी-कल्याण-फलटण-पंढरपूर अशा विविध मार्गांचा समावेश आहे.तसेच शहापूर-ठाणे-फलटण-पंढरपूर, कल्याण-विठ्ठलवाडी-नगर-फलटण-पंढरपूर, मुरबाड-कल्याण-नगर-फलटण-पंढरपूर, विठ्ठलवाडी-नगर-फलटण-पंढरपूर आणि वाडा-ठाणे-पुणे-पंढरपूर या मार्गांवरही प्रत्येकी विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
या सर्व जादा फेऱ्यांसाठी संगणकीय आणि समूह आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरक्षणाची स्थिती दररोज तपासून आवश्यकतेनुसार अतिरिक्त व्यवस्था केली जाणार आहे. २५ ते ३० जुलैदरम्यान पंढरपूरच्या चंद्रभागा बसस्थानकातून परतीच्या प्रवासासाठीही विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.


