नांदेड : नांदेड जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि धार्मिक महत्त्व असलेल्या सहस्त्रकुंड येथे तब्बल ४४ वर्षांनंतर भगवान परशुराम यांच्या मूर्तीची विधिवत पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर आणि श्री सहस्त्रकुंड बाणगंगा महादेव मंदिर तीर्थक्षेत्र धर्मदाय ट्रस्टचे सचिव सतीश शंकरराव वाळकीकर यांच्या पुढाकारातून हा धार्मिक सोहळा पार पडला.
सन १९८२ मध्ये आलेल्या महापुरात सहस्त्रकुंड परिसरातील भगवान परशुराम मंदिरासह अनेक देवतांच्या मूर्ती वाहून गेल्या होत्या. त्यानंतर अनेक वर्षे या पवित्र स्थळाच्या पुनर्विकासाची प्रतीक्षा होती. अखेर स्थानिक ट्रस्ट, सामाजिक कार्यकर्ते आणि ब्राह्मण महासंघाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भगवान परशुराम मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली आणि या ऐतिहासिक तीर्थक्षेत्राला पुन्हा एकदा धार्मिक ओळख मिळाली. भगवान परशुराम मूर्तीची प्रतिष्ठापना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आली. या कार्यासाठी अनिल भोरे, देशपांडे काका, अनिल डोईफोडे, महावीर शेठ, पवार काका, संतोष कुलकर्णी, शशिकांत पाटील आणि कृष्णा उमरीकर यांचे सहकार्य लाभले. सहस्त्रकुंड परिसराच्या विकासासाठी प्रशासनाकडूनही विशेष प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र शासन आणि पर्यटन विभागाने या ठिकाणाचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश केला आहे. पिण्याचे पाणी, सौर व स्ट्रीट लाईट व्यवस्था, यात्री निवास तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष कृती आराखडाही तयार करण्यात येत आहे.
या विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी आणि किनवटचे आमदार भीमराव केराम यांचे विशेष सहकार्य मिळत असल्याचे सांगण्यात आले असून, सहस्त्रकुंड परिसरासाठी ४७ हेक्टर जागेचा सातबारा मिळणार असल्याची माहिती देण्यात आली.काळ्याभोर बेसॉल्ट खडकांवरून कोसळणारा शुभ्र धबधबा, नदीच्या मध्यभागी असलेली परशुराम टेकडी, गोमुख तीर्थ, सीतामाईची नान्ही आणि बाणगंगा महादेव मंदिर यामुळे सहस्त्रकुंड हे धार्मिक श्रद्धेसोबतच निसर्ग पर्यटनाचे आकर्षण बनत आहे. “सहस्त्रकुंड हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा संगम आहे. राज्यभरातील भाविकांनी येथे येऊन भगवान परशुरामांचे दर्शन घ्यावे आणि या निसर्गरम्य परिसराचा आनंद घ्यावा,” असे आवाहन प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी केले. तर सतीश वाळकीकर यांनी सहस्त्रकुंडचा विकास एक आदर्श धार्मिक-पर्यटन केंद्र म्हणून करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. येत्या काळात सहस्त्रकुंड हे श्रद्धा आणि पर्यटनाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


