सायबर ठगीची नवी शक्कल! निर्मला सीतारामन यांचा फोटो वापरून महिलेची 43 लाखांची फसवणूक

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे छायाचित्र वापरून तयार करण्यात आलेल्या फसव्या ऑनलाइन जाहिरातीला भुलून एका 59 वर्षीय महिलेची तब्बल 43 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पूर्व विभाग सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला एका खासगी शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यात फेसबुक पाहत असताना त्यांना निर्मला सीतारामन यांचे छायाचित्र असलेली एक जाहिरात दिसली. अवघ्या 22 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून लाखो रुपयांचा नफा मिळू शकतो, असा दावा या जाहिरातीत करण्यात आला होता.
जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर संबंधित महिलेसमोर परकीय चलन व्यवहारांबाबत माहिती देणारे वेबपेज उघडले. त्यावर नोंदणी केल्यानंतर ‘पांड्या’ नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. परकीय चलनाची खरेदी-विक्री कधी करावी याबाबत मार्गदर्शन करत त्याने सुरुवातीला 200 अमेरिकन डॉलर गुंतवण्यास सांगितले. या व्यवहारातून 20 डॉलरचा नफा मिळाल्याने महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला.
यानंतर अधिक नफ्याच्या आमिषाने महिलेने टप्प्याटप्प्याने तब्बल 48 लाख रुपये गुंतवले. मात्र, नफ्याची रक्कम खात्यात जमा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विविध कारणे देत टाळाटाळ करण्यात आली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.प्राथमिक तपासात महिलेचे सुमारे 43 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले असून, सायबर पोलिस पुढील तपास करत आहेत.

Related Posts

LPG ग्राहकांना महागाईचा आणखी फटका; गॅस सिलिंडर महाग, अनुदानित सिलिंडरची संख्या घटली

देशभरातील एलपीजी ग्राहकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जून महिन्यात एलपीजी संदर्भात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे घरगुती ग्राहकांसह उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली…

नागपुरातील रस्त्यांवर हायकोर्टाचा सवाल; “मेट्रोसिटी म्हणायचं, पण रस्त्यांची ही अवस्था का?”

नागपूर : शहरातील काँक्रीट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही नागरिकांना मूलभूत…