दिल्लीतील हॉटेलमध्ये भीषण आग; 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील हौझ राणी येथे असलेल्या Flourish Inn हॉटेलमध्ये आज सकाळी भीषण आग लागून 21 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत डझनहून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
पाच मजली आणि सुमारे 25 खोल्या असलेल्या या हॉटेलमध्ये आग लागली तेव्हा 40 ते 50 हून अधिक लोक उपस्थित होते. त्यातील बहुतांश जण झोपेत असल्याने आगीचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. सकाळी सुमारे 8.50 वाजता अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
आग इतक्या वेगाने पसरली की अनेकांना बाहेर पडण्यास मार्ग मिळाला नाही. जीव वाचवण्यासाठी काहींनी हॉटेलच्या खिडक्यांमधून उड्या मारल्याचेही समोर आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, पाण्याचे टँकर, क्युआरव्ही आणि इतर बचाव पथके दाखल झाली होती.
स्थानिकांच्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये प्रामुख्याने परदेशी नागरिक वास्तव्यास होते. हे नागरिक दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी भारतात आले होते. आग लागली तेव्हा अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक झोपलेले होते. मृतांमध्ये रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
हॉटेलच्या बेसमेंटमधील रेस्टॉरंटचे मुख्य शेफ केसर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे आठ वाजता स्वयंपाकघरातील इलेक्ट्रिक शेगडी सुरू करण्याचा प्रयत्न करताच अचानक आगीच्या ज्वाला भडकल्या. त्यानंतर काही क्षणांतच संपूर्ण हॉटेल आगीच्या विळख्यात सापडले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Related Posts

LPG ग्राहकांना महागाईचा आणखी फटका; गॅस सिलिंडर महाग, अनुदानित सिलिंडरची संख्या घटली

देशभरातील एलपीजी ग्राहकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जून महिन्यात एलपीजी संदर्भात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे घरगुती ग्राहकांसह उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली…

नागपुरातील रस्त्यांवर हायकोर्टाचा सवाल; “मेट्रोसिटी म्हणायचं, पण रस्त्यांची ही अवस्था का?”

नागपूर : शहरातील काँक्रीट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही नागरिकांना मूलभूत…