अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( प्रतिनिधी ) : मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा कंटाळा, अभ्यासात आवड न वाटणे आणि कमी वेळात अभ्यास आटोपण्याची प्रवृत्ती वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि ग्रहणशक्ती वाढविण्यासाठी ‘उत्थान-सफलता-विजय’ अभियान राबविण्यात येत आहे.
पू. स्वामी अच्युतानंद सरस्वती यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी विविध विद्यालयांमध्ये स्लाईड शो प्रेझेंटेशन व व्याख्यानांच्या माध्यमातून कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवणे, विषय अधिक प्रभावीपणे लक्षात ठेवणे आणि जीवनातील विविध क्षेत्रांत यश मिळविण्यासाठी आवश्यक सवयी विकसित करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. सध्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा अतिवापर, अभ्यासाचा कंटाळा, अभ्यासात एकाग्रता न राहणे आणि अभ्यासाबाबत अनास्था अशा समस्या दिसून येत आहेत. त्यामुळे पालक आणि शिक्षकांसाठीही ही चिंतेची बाब ठरत आहे. विद्यार्थ्यांची ग्रहणशक्ती व स्मरणशक्ती वाढविण्यासाठी स्वामी अच्युतानंद सरस्वती स्वतः शाळा व महाविद्यालयांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
“मुले ही राष्ट्राची संपत्ती आहेत. योग्य वयात त्यांच्यावर चांगल्या सवयी व संस्कार झाले, तर त्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होते,” या उद्देशाने हा उपक्रम २००८ मध्ये सुरू करण्यात आला होता. मात्र, २०१६ मध्ये झालेल्या अपघातामुळे अभियानाचे काम काही काळ थांबले. आता नव्या जोमाने हे अभियान पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
पाचवी कार्यशाळा पैठण येथे
दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी आयकॉन पॅरेडाईज स्कूल, पैठण, महाराष्ट्र येथे अभियानाची पाचवी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आगामी काळात विविध विद्यालयांमध्ये ‘उत्थान-सफलता-विजय’ कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी काही तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. या कार्यशाळा हिंदी, मराठी आणि इंग्रजी या भाषांमध्ये आयोजित केल्या जात असल्याची माहिती अभियानाचे प्रवर्तक पू. स्वामी अच्युतानंद सरस्वती यांनी दिली.


