अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणाऱ्या रस्ते, पूल आणि इमारतींची कामे जनतेच्या सोयीसुविधांसाठी असल्याने ती दर्जेदार करण्यावर भर द्यावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मंत्री भोसले यांनी अमरावती विभागातील बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी आमदार प्रविण पोटे, संजय खोडके, प्रकाश भारसाकळे, प्रताप अडसड, हरीष पिंपळे, सुलभा खोडके, राजेश वानखडे, उमेश यावलकर, प्रविण तायडे, किसन वानखडे आदी उपस्थित होते. मंत्री भोसले म्हणाले, धोकादायक पुलांची माहिती घेण्यात आली आहे. या पुलांची पाहणी करून आवश्यक ती देखभाल व दुरुस्ती करण्यात यावी. त्यामुळे कोणतीही दुर्घटना होणार नाही, याची काळजी घ्यावी. पुलांना लोखंडी कठड्यांऐवजी सिमेंटचे कठडे उभारून कायमस्वरूपी व्यवस्था करण्याबाबत तपासणी करावी. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येत असून, तातडीची उपाययोजना म्हणून मुरुमाने हे खड्डे भरावेत. वनक्षेत्रातील रस्ते सध्या अस्तित्वात असलेल्या रुंदीमध्ये बळकट करणे शक्य असल्याने विभागाने अशी कामे सुचवावीत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते आणि इतर कामे करण्यापूर्वी लोकप्रतिनिधींना अवगत करावे. यामुळे आवश्यक असलेली कामे सुटणार नाहीत. रस्त्यांची कामे झाल्यानंतर वृक्षारोपण करण्यात यावे. रस्त्यांपासून थोड्या अंतरावर झाडे लावल्यास भविष्यात रस्त्यांमध्ये अडथळा येणार नाही. तसेच कडुनिंब, वड आणि पिंपळाची झाडे लावल्यास ती दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल. ही झाडे जगविण्यावर भर द्यावा. नागरिकांच्या सुविधांसाठी सुविधा केंद्रे उभारण्यात येत आहेत. ही केंद्रे सुस्थितीत राहावीत आणि नागरिकांच्या वापरात राहावीत यासाठी ती खासगी संस्थांना देण्यात यावीत. आवश्यकता असल्यास महिला बचतगटांना दिल्यास त्यांची निगा राखली जाईल, असेही मंत्री भोसले यांनी सांगितले. बैठकीत अमृतकाल रस्ते, विकास आराखडा, धोकादायक पूल, आदिवासी क्षेत्रातील इमारती आदींबाबत मुख्य अभियंता सुषमा बोंद्रे यांनी सादरीकरण केले.


