मेंढपाळ समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर अखेर सकारात्मक हालचाली सुरू झाल्याचे चित्र समोर आले आहे. मेंढपाळ नेते अर्जुन महानर यांच्या सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आमदार बच्चू कडू यांनी मेंढपाळांच्या विविध मागण्या ठामपणे मांडत त्यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
बैठकीत वनहक्क समितीच्या धर्तीवर स्वतंत्र ‘मेंढपाळ वनहक्क समिती’ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच पारंपरिक चराईचे मार्ग पुन्हा खुले करण्यासह प्रत्येक जिल्ह्यात महसूल विभागाच्या ताब्यातील उपलब्ध सरकारी जमिनी चराईसाठी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मेंढपाळांच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत पुढील १५ दिवसांत स्वतंत्र विमा योजना सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. याशिवाय पशुधनाचे नियमित लसीकरण आणि आरोग्य तपासणी अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.
राज्याबाहेरून येणाऱ्या पशुधनाची आरोग्य तपासणी, नोंदणी आणि नियंत्रण व्यवस्था अधिक कडक करण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीनंतर अर्जुन महानर यांच्या उपोषणाची दखल घेतल्याबद्दल तसेच मेंढपाळांच्या प्रश्नांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल समाजातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळेल, अशी अपेक्षा मेंढपाळ समाजाकडून व्यक्त होत आहे.


