राज्यात उष्णतेच्या कहर पाहायला मिळत आहे. बहुतांश जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने 40 अंश ते थेट 47 अंश सेल्सियसपर्यंत मजल मारली आहे. अशातच आता मुंबईसह कोकणातील काही भागांत पुढील तीन तासांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज (23 मे) सकाळी 7 वाजता जारी केलेल्या ‘नाऊकास्ट वॉर्निंग’मध्ये मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो वॉर्निंग जारी करण्यात आली आहे. दरम्यान, या कालावधीत काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, वातावरणात बदल झाल्याने मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पुढील काही तासांत काही भागांत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, कोकणात सध्या पावसाच्या आगमनाचे चाहूल देणारे संकेत दिसत आहेत. कोकणातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी देखील बरसत आहेत. ढगाळ वातावरण, पावसाची एखादी सर, असं वातावरण सध्या कोकणात आहे. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे उकाडा देखील जास्त प्रमाणात जाणवू लागला आहे. तर कोणत्याही क्षणी मान्सूनच्या आगमनाची वार्ता मिळेल, असं चित्र सध्या कोकणात बघायला मिळत आहे.
सातारा-कराड मार्गावरील नागठाणे, उंब्रज, तासवडे टोलनाका परिसरात सायंकाळी झालेल्या पावसाने एका मेंढपाळाचा बळी घेतला. नागठाणे, अतित गावच्या हद्दीवर वीज पडून तुकाराम सिधु होनमाने (वय 65) यांचा मृत्यू झाला. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील होते. तुकाराम होनमाने हे आपल्या मेंढ्यांसाठी भुईमूगाचे वेल गोळा करत असताना विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. यावेळी ते शेतातील झाडा जवळ थांबले होते. त्याचवेळी विजेचा लोळ खाली आला अन् ते ज्या झाडाखाली उभे होते त्या झाडासह होनमाने यांच्या अंगावर वीज कोसळली यात ते जागीच ठार झाले. तुकाराम होनमाने हे पुढील दोन दिवसात आपल्या सोलापूर जिल्ह्यातील गावी परतणार होते.पंरतू त्यापूर्वी पावसाने त्यांचा बळी घेतला.


