नागपूर : बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील ‘लोकनृत्य’ या प्रकरणावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या धड्यात महाराष्ट्रातील लोकनृत्यांपेक्षा इतर राज्यांतील लोकनृत्यांना अधिक स्थान देण्यात आल्याचा आरोप होत आहे. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आणि सांस्कृतिक जाणकारांनी यावर आक्षेप नोंदवला आहे.
लोकनृत्य या धड्यात एकूण पाच लोकनृत्य प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील केवळ ‘दिंडी नृत्य’ या एकाच लोकनृत्याची माहिती देण्यात आली आहे. तर गुजरातमधील ‘रास नृत्य’, पंजाबमधील ‘भांगडा’, छत्तीसगडमधील ‘शेतकऱ्यांचे नृत्य’ आणि बिहारमधील ‘आदिवासी नृत्य’ या लोकनृत्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकनृत्यांना अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.या संदर्भात अखिल भारतीय मराठी महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीही आक्षेप नोंदवला आहे. महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, विविध लोकनृत्य परंपरा आणि प्रादेशिक सांस्कृतिक वारसा लक्षात घेता पाठ्यपुस्तकातील मांडणीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील या प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात आणि सांस्कृतिक क्षेत्रात चर्चा सुरू असून, महाराष्ट्रातील लोककला आणि लोकनृत्यांना पाठ्यपुस्तकांमध्ये अधिक स्थान मिळावे, अशी मागणी विविध स्तरांतून पुढे येत आहे.


