मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता नदी-नाल्यांवरही दिसून येत आहे. मुंबई आणि धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर उल्हास नदीने इशारा पातळी गाठल्याने कल्याण-डोंबिवलीसह नदीकाठच्या भागांसाठी प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे सातही जलाशयांतील पाणीसाठा २८.९२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. हा पाणीसाठा मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी पुढील ३६ दिवस पुरेल, अशी माहिती देण्यात आली आहे.गेल्या काही तासांत उल्हास नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदीने इशारा पातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच संबंधित सर्व यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या असून संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
सकाळी ७.३० वाजताच्या नोंदीनुसार उल्हास नदीची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे :
सद्यस्थिती : १७.५० मीटर
इशारा पातळी : १६.५० मीटर
धोक्याची पातळी : १७.५० मीटर
पावसाची नोंद (१६:०० वाजेपर्यंत) :
आजचा पाऊस : २९ मिमी
एकूण पाऊस : ६९८ मिमी


