इम्फाळ. मणिपूरमध्ये एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या रॉकेट हल्ल्याने पुन्हा एकदा अस्थिरतेला तोंड फोडले आहे. 7 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात दोन लहान मुलांसह तिघांचा मृत्यू झाला, तर 6 एप्रिलला बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग भागात घरावर बॉम्बहल्ला करून दहशत पसरवण्यात आली. या पार्श्वभूमीवर 18 एप्रिलपासून संपूर्ण बंद पाळला जात असून जनजीवन ठप्प झाले आहे. दरम्यान, ‘मीरा पैबी’ या महिलांच्या संघटनेने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून शांततेसाठी लढा सुरू केला आहे. हजारो महिला दिवसा रस्ते अडवून धरणे धरत आहेत, तर रात्री मशालींच्या रॅली काढून परिसरात गस्त घालत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारामुळे राज्यातील सामाजिक आणि आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. बंदमुळे व्यापारावरही मोठा परिणाम झाला असून ख्वैरमबंद इमा मार्केटमधील अनेक महिलांना दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. 25 एप्रिल रोजी ‘कोऑर्डिनेटिंग कमिटी ऑन मणिपूर इंटिग्रिटी’ने मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. 1980 च्या दशकात व्यसनमुक्ती आणि सामाजिक एकजुटीसाठी सुरू झालेली ‘मीरा पैबी’ चळवळ आज मानवाधिकार आणि शांततेसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मे 2023 पासून मैतेई आणि कुकी समुदायांतील हिंसाचारामुळे हजारो लोक विस्थापित झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयश आल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये राजीनामा दिला आणि त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. नवीन मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांच्या नेतृत्वातही परिस्थिती अद्याप पूर्णपणे सुरळीत झालेली नाही.


