ठाणे. जिल्ह्यातील महिला आणि बालविकास विभागांतर्गत जिल्हा नियोजन निधीत सुमारे ७३ कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मावळ तालुक्यातील किवळे येथील कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना तटकरे यांनी स्पष्ट केले की, महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी राखीव असलेला निधी गैरमार्गाने वापरणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.या प्रकरणाचा चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या घडामोडीमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.


