अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : अहिल्यानगर शहरात समर्थ सत्संग परिवाराच्या वतीने समर्थ रामदास स्वामींच्या विचारांतून व्यक्तिगत आध्यात्मिक प्रगतीबरोबरच समाजात सुसंस्कारी पिढी निर्माण करण्यासाठी गेली अनेक वर्षे कार्य सुरू आहे. समर्थ भक्त मंदारबुवा रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली सत्संग परिवाराकडून विविध ठिकाणी श्रीमद्भागवत कथा, श्रीराम कथा, ग्रंथराज दासबोध, मनोबोध निरूपण आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचबरोबर विविध तीर्थक्षेत्रांतही नैमित्तिक कथेचे आयोजन केले जाते.
अहिल्यानगर शहरात प्रतिवर्षी समर्थ सत्संग परिवाराकडून अशी कथा आयोजित केली जाते. यावर्षी २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२६ या कालावधीत गुलमोहर रोड, आम्रपाली कार्यालय येथे श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. समर्थ भक्त मंदारबुवा रामदासी यांच्या रसाळ वाणीतून कथा श्रवणाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. या संदर्भात रविवार, दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी समर्थ परिवाराची नियोजन बैठक आम्रपाली कार्यालय येथे संपन्न झाली. बैठकीस परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषत्वाने श्रीरामांच्या चरित्रातील पैलू तरुणाईने समजून घ्यावेत, यासाठी तरुण वर्गाचा कथा श्रवण व आयोजनात सहभाग असावा, असे उपस्थित पालक व ज्येष्ठ भाविकांनी मत व्यक्त केले.
कथा कालावधीत दैनंदिन अन्नदान तसेच विविध सामाजिक उपक्रम कशा प्रकारे राबवावेत, यावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. यानंतर होणाऱ्या मासिक नियोजन बैठकीत पुढील नियोजन करण्याचे ठरले. समर्थ परिवारातील अनेक भगिनी व पुरुष वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. अनिकेत घोटणकर यांनी बैठकीचे संचालन केले. “कार्य श्रीरामाचे आहे. त्यांच्याच इच्छेने होणारे हे कार्य प्रभू श्रीराम अनेकांना प्रेरणा देऊन करून घेतील,” असा विश्वास समर्थ भक्त मंदारबुवा यांनी व्यक्त केला.


