अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी) : गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी सायंकाळी अवकाशात चंद्रकोर आणि त्याच्या शेजारी तेजस्वी शुक्र तारा असे नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले. अनेक नागरिकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपले. एल निनोच्या प्रभावामुळे प्रशांत महासागरातील उष्मांक वाढल्याचे मत तज्ज्ञांनी माध्यमातून व्यक्त केले आहे. परिणामी गणपती स्थापनेच्या दिवशी वरुणराजाचे आनंद देणारे आगमन झाले नाही. बाप्पा कोरडे आले, भिजले नाहीत व भिजवलेही नाहीत, ही चिंताजनक बाब आहे.
आता परतीच्या पावसाचा अतिशय अल्प कालावधी शिल्लक राहिला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस न झाल्याने शेतातील पिके करपू लागली आहेत. निसर्गाने काही चमत्कार केला, श्रीगणेशाने भाविकांवर कृपा केली आणि उर्वरित कालावधीत पावसाने हजेरी लावली तरच शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी पुढील वर्षाचे चित्र आशादायक राहील. अन्यथा दुष्काळी परिस्थितीचा सामना केल्यावाचून पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण होत आहे. अवकाशातील चंद्रकोर आणि शुक्र ताऱ्याचे दृश्य नयनरम्य असले, तरी बळीराजाची चिंता वाढवणारे आहे, हे तितकेच खरे.


