नागपूर : नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चनकापूर येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या उपस्थितीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ आणि शालेय साहित्य देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी विजयलक्ष्मी बिदरी यांनी शासनाच्या शाळा या गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पालकांनी विश्वासाने आपल्या पाल्यांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळांमध्ये करून शासनाच्या शैक्षणिक सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी लहानपणापासून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त व मेहनतीची सवय लावावी, असे मार्गदर्शनही त्यांनी केले. जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेणारे विद्यार्थीही आपल्या गुणवत्तेच्या आणि परिश्रमाच्या जोरावर भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा तसेच इतर केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षण हा जीवनातील यशाचा भक्कम पाया असून जिल्हा परिषद शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा आणि विविध उपक्रमांचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या स्वागतामुळे शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


