चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : येथील पवित्र दीक्षाभूमीवर विकासकामे करताना तेथील ऐतिहासिक बुद्धविहार पाडले जाणार असल्याच्या संभ्रमावरून समाजबांधव अस्वस्थ आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी हा संशय दूर करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याने ‘दीक्षाभूमी मुक्ती जनआंदोलन’तर्फे येत्या १६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती जनआंदोलन समितीने पत्रकार परिषदेत दिली.
दीक्षाभूमी येथील संभ्रम दूर करण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीने एका बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न देताच ही बैठक अर्ध्यावर गुंडाळण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे. यामुळे समाजबांधवांमधील संशय अधिक वाढला असून, दीक्षाभूमी मुक्त करून बुद्धविहाराचे पुनरुज्जीवन करावे आणि जनभावनेचा आदर करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीत एकाच कुटुंबातील सदस्यांचे वर्चस्व असून गेल्या ३६ वर्षांत दीक्षाभूमीचा अथवा बुद्धविहाराचा कोणताही ठोस विकास झाला नसल्याचा गंभीर आरोप समितीने केला आहे. या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट रोजी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन येथे शेकडो बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत आंदोलनाचा निश्चय करण्यात आला होता.
त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आगामी १५ व १६ ऑक्टोबर रोजी होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा सर्वसामान्य समाजाच्या सहभागातून पार पाडण्यासाठी प्रशासनाने मध्यस्थी करावी, अशी विनंतीही करण्यात आली होती. विकासकामांदरम्यान नेमक्या कोणत्या वास्तू पाडल्या जाणार, याचा स्पष्ट खुलासा करावा या मुख्य मागणीसाठी १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. या पत्रपरिषदेला भन्ते अनिरुद्ध थेरो, देशक खोब्रागडे, प्रतीक डोर्लीकर, राजस खोब्रागडे, करण सोमकुंवर, सिद्धार्थ शेंडे, चैतन्य बाबाज यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


