सातारा : सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शनिवारी (1 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 6 फूटांपर्यंत उघडण्यात आले. यामुळे कोयना नदीत एकूण 33 हजार 826 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कोयना सिंचन विभागाच्या माहितीनुसार, सांडव्यावरून 32 हजार 776 क्युसेक्स तर धरणाच्या पायथा विद्युतगृहातून 1 हजार 50 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे कोयना नदीची पाणीपातळी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात किंवा नदीकाठी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
याशिवाय ग्रामपंचायती, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


