नवी दिल्ली : आगामी एशियन गेम्स 2026 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत संघाची माहिती दिली. यावेळी संघ निवडीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून श्रेयस अय्यरकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
टी-20 क्रिकेटमधील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला यावेळी संघात स्थान मिळालेले नाही. दुसरीकडे युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याची संघात निवड करण्यात आल्याने त्याच्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील एशियन गेम्समध्ये भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे यंदाही सलग दुसरे सुवर्णपदक मिळवण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
संघात यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि इशान किशन यांना संधी देण्यात आली आहे. दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडलेल्या हर्षित राणाचेही संघात पुनरागमन झाले आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्यावर असणार आहे.अष्टपैलू विभागात अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तर फिरकी गोलंदाजीसाठी रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती आणि वैभव सूर्यवंशी.


