अटल सेतूवर कार थांबवून तरुणाची समुद्रात झेप; पुण्यातील युवकाचा शोध सुरू

नवी मुंबई : नवी मुंबईतील अटल सेतूवर रविवारी पहाटे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. पुण्यातील प्रतीक सुभाष रासकर (वय २८) या तरुणाने अटल सेतूवर कार थांबवून समुद्रात उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संबंधित तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलीस, सागरी सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सुमारे १.२९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अटल सेतूवर एक कार उभी असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास करण्यात आला. त्यावेळी प्रतीक रासकर यांनी समुद्रात उडी मारल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शोधकार्य सुरू केले. या प्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे. मात्र घटनेनंतर अनेक तास उलटूनही प्रतीक यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. समुद्र परिसरात विविध यंत्रणांच्या मदतीने शोध सुरू असून, पोलिसांकडून सर्व शक्य त्या दिशेने तपास केला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे प्रतीक यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या संदर्भात कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अटल सेतूवर यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, त्यामुळे पुलावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.

Related Posts

LPG ग्राहकांना महागाईचा आणखी फटका; गॅस सिलिंडर महाग, अनुदानित सिलिंडरची संख्या घटली

देशभरातील एलपीजी ग्राहकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जून महिन्यात एलपीजी संदर्भात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे घरगुती ग्राहकांसह उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली…

नागपुरातील रस्त्यांवर हायकोर्टाचा सवाल; “मेट्रोसिटी म्हणायचं, पण रस्त्यांची ही अवस्था का?”

नागपूर : शहरातील काँक्रीट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही नागरिकांना मूलभूत…