पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात भाविकांची मोठी गर्दी होत असताना पुणे मेट्रोने प्रवासी संख्येचा नवा विक्रम नोंदवला आहे. ९ जुलै २०२६ रोजी अवघ्या एका दिवसात तब्बल ३ लाख ५२ हजार ६०६ प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला. ही पुणे मेट्रोच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्या ठरली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले आहेत. यापैकी अनेकांनी शहरातील प्रवासासाठी मेट्रोचा पर्याय निवडला. वाढती गर्दी लक्षात घेऊन मेट्रो प्रशासनाने विशेष सेवा सुरू केल्या. तसेच अतिरिक्त फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली. स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करून गर्दीचे नियोजन करण्यात आल्याने प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत पार पडला. वारीचा उत्साह मेट्रोच्या डब्यांमध्येही अनुभवायला मिळाला. “विठ्ठल-विठ्ठल” आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. काही वारकरी टाळ-मृदंगाच्या साथीने अभंग गात प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे मेट्रोचा प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापुरता मर्यादित न राहता भक्तीची अनुभूती देणारा ठरला.
मेट्रोमध्ये अभंग गाणाऱ्या वारकऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम पाहायला मिळाल्याच्या प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त होत आहेत. काही भाविकांनी मेट्रोमुळे वेळेची बचत झाल्याचे आणि प्रवास अधिक सोयीस्कर झाल्याचे सांगितले. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत श्रद्धेसोबत आधुनिक वाहतूक व्यवस्थेचाही प्रभावी वापर झाल्याचे चित्र दिसून आले


