अहिल्यानगर : पुण्यातील वारी अपघाताची धग अद्याप कायम असतानाच संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात आणखी एक अपघात घडल्याने वारकरी भाविकांमध्ये चिंता वाढली आहे. नगर-सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीसी शिवारात भरधाव पिकअपने एका वारकऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात वारकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडी क्रमांक १९ मधील वसंतराव गवते हे रस्ता ओलांडत असताना ही दुर्घटना घडली. अचानक वेगाने आलेल्या पिकअपने त्यांना धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित वारकऱ्यांनी तातडीने मदत करत त्यांना रुग्णालयात हलवले. सोमवारी रात्री साकत येथे पालखीचा मुक्काम होता. मंगळवारी सकाळी पुढील प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच हा अपघात घडला. विशेष म्हणजे धडक दिल्यानंतर चालकाने वाहन सोडून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली असून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.
जेजुरीजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात असतानाच ही नवी घटना समोर आली आहे. वारी मार्गावरील वाहतूक नियंत्रण आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.वारकऱ्यांच्या अखंड श्रद्धेच्या प्रवासात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.


