नवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने शेतीमध्ये तण नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या ‘पॅराक्वाट’ (Paraquat) या अत्यंत विषारी तणनाशकावर संपूर्ण देशात तात्काळ प्रभावाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता या रसायनाची आयात, उत्पादन, विक्री, वाहतूक, वितरण आणि वापर पूर्णपणे बंद होणार आहे.
भात आणि गव्हाच्या पिकांमध्ये तण नष्ट करण्यासाठी पॅराक्वाटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. मात्र हे रसायन मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असल्याचे अनेक अहवालांमधून समोर आले होते. विषबाधा, गंभीर आरोग्य समस्या आणि मृत्यूच्या घटनांनंतर डॉक्टर, विषशास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञांकडून यावर बंदीची मागणी सातत्याने होत होती.कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कीटकनाशक कायदा १९६८ च्या कलम २७ अंतर्गत ही अधिसूचना जारी केली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की लोकांच्या आरोग्याच्या संरक्षणाला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या देशात पॅराक्वाटचा शोध लागला, त्या देशासह ७० हून अधिक देशांमध्ये यावर आधीच बंदी लागू आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे बाजारातून पॅराक्वाट हळूहळू पूर्णपणे गायब होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता सुरक्षित आणि पर्यावरणपूरक तणनियंत्रणाच्या पर्यायांकडे वळावे लागणार आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, योग्य मार्गदर्शन आणि पर्यायी उपाय उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना या बदलाचा मोठा फटका बसणार नाही. ग्रामीण भागात अनेक शेतकरी हे औषध वापरत होते. त्यामुळे या बंदीमुळे सुरुवातीला काही प्रमाणात संभ्रम निर्माण होऊ शकतो. मात्र दीर्घकालीन दृष्टीने पाहता हा निर्णय शेतकऱ्यांचे आरोग्य, कुटुंबांची सुरक्षितता आणि पर्यावरणाचे संरक्षण यासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.


