पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. या हप्त्याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 2 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा न झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.केंद्र सरकारच्या या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात 6 हजार रुपयांची मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. यावेळी काही लाभार्थ्यांना हप्ता न मिळण्यामागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणे असल्याचे समोर आले आहे.
यामध्ये सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ई-केवायसी (e-KYC) अपूर्ण असणे. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांचे हप्ते थांबवले जाऊ शकतात.दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे भू-सत्यापन किंवा लँड सीडिंगची प्रक्रिया पूर्ण न करणे. शेतजमिनीची माहिती पडताळणीसाठी आवश्यक असलेल्या या प्रक्रियेकडे दुर्लक्ष झाल्यास लाभार्थ्यांच्या खात्यातील हप्ता रोखला जाऊ शकतो.याशिवाय आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे हे देखील हप्ता न मिळण्यामागील एक प्रमुख कारण मानले जात आहे. आधार लिंकिंग पूर्ण नसल्यास निधी थेट खात्यात जमा होण्यास अडचणी निर्माण होतात.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांचा हप्ता रखडला आहे त्यांनी सर्वप्रथम त्यामागील कारण तपासून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. पडताळणी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांचे नाव पुन्हा मंजूर यादीत समाविष्ट केले जाऊ शकते. त्यानंतर रखडलेली रक्कम पुढील हप्त्यासोबत जमा होण्याची शक्यता असते.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप 23वा हप्ता जमा झालेला नाही, त्यांनी ई-केवायसी, भू-सत्यापन आणि आधार लिंकिंगची स्थिती तातडीने तपासून घ्यावी.


