मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीत महत्त्वाचे पाऊल टाकत शाहूनगर परिसरातील रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी नोटिसा देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामांना आणखी गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.
मागील काही दिवसांपासून पुनर्विकासासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार आता संबंधित रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शाहूनगरमधील सुमारे 900 कुटुंबांना या प्रक्रियेचा भाग बनावे लागणार आहे.
ज्यांनी तात्पुरत्या निवासाचा पर्याय निवडला आहे, त्यांच्यासाठी सेक्टर 5 मधील निवासी इमारतींमध्ये घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर इतर रहिवाशांना भाडे अनुदानासह पर्यायी निवासाची सुविधा दिली जाणार आहे. स्थलांतरापूर्वी प्रत्येक कुटुंबासोबत करार करण्यात येणार असून त्यामध्ये पुनर्वसनासंदर्भातील सर्व अटी व अधिकार स्पष्ट करण्यात येतील. पुनर्वसन योजनेनुसार पात्र रहिवाशांना त्यांच्या विद्यमान घरापेक्षा अधिक प्रशस्त घरे देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कायमस्वरूपी घर मिळेपर्यंत रहिवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर निवास उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.
स्थलांतर पॅकेजअंतर्गत घराच्या आकारानुसार दरमहा भाडे सहाय्य देण्यात येणार असून त्यामध्ये दरवर्षी वाढ करण्याची तरतूद आहे. याशिवाय प्रत्येक कुटुंबाला स्थलांतरासाठी स्वतंत्र आर्थिक मदतही दिली जाणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत टप्प्याटप्प्याने बांधकाम सुरू करून पात्र रहिवाशांना शक्य तितक्या लवकर कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


