पुणे : नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील शाळांसमोर पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या ‘एक पेड माँ के नाम 3.0’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राला यंदा ५३ लाखांहून अधिक वृक्ष लागवडीचे लक्ष्य देण्यात आले असून, राज्यातील प्रत्येक शाळेने किमान ५० झाडे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने याबाबत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश जारी केले आहेत. ५ जून ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही मोहीम राबवली जाणार असून, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता आणि जबाबदारीची भावना निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
शाळेच्या परिसरात जागेची कमतरता असल्यास विद्यार्थी आणि शिक्षकांनी घराजवळील जागा, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यांच्या कडेला किंवा शाळेकडे जाणाऱ्या मार्गांवर वृक्षारोपण करण्याचा पर्याय वापरावा, असेही सांगण्यात आले आहे. तसेच लावलेल्या रोपांची नियमित देखभाल आणि निरीक्षण करण्यावरही भर देण्यात आला आहे.
दरम्यान, शाळांमधील इको क्लबच्या माध्यमातून ५ ते ३० जूनदरम्यान ‘ग्रीन समर कॅम्प’ आयोजित केला जाणार आहे. या शिबिरात पाणी बचत, ऊर्जा बचत, ई-कचरा व्यवस्थापन, शाश्वत जीवनशैली आणि प्लास्टिकमुक्ती यांसारख्या विषयांवर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक समुदायाच्या सहभागातून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.


