राज्यात सध्या सुरू असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या आणि इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांच्या आंदोलनाचा खरपूस समाचार घेतला, तसेच राज्यातील इंधन पुरवठ्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.
कांदा दरावरून सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कालच केंद्र सरकारने कांदे खरेदीचा भाव साडेतीन रुपयांनी वाढवून जवळपास पंधरा रुपयांपर्यंत नेलेला आहे. कांद्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी देखील सुरू केलेली आहे. आम्ही केंद्र सरकारला या संदर्भात बैठक घेण्याची विनंती केली होती. उद्या संध्याकाळी त्या संदर्भात बैठक होणार आहे. कांद्याच्या संदर्भात राज्य आणि केंद्र सरकार चर्चा करत आहे. पंधरा रुपयांची खरेदी आपण सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात राज्यातलं सरकार संवेदनशील आहे. पण काही लोक विनाकारण याबाबत राजकारण करू इच्छितात.
त्यांना माझं सांगणं आहे की, राज्य आणि केंद्र सरकारने 15 रुपयांनी कांदा खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी असा निर्णय केला होता का ते दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करत आहोत. आम्हाला याची कल्पना आहे की, इतके करून भागणार नाही, अनेक गोष्टी कराव्या लागतील, त्यामुळेच केंद्र सरकारसोबत उद्याला बैठक आम्ही घेत आहोत. त्या बैठकीतून दीर्घकालीन उपाययोजना काय करता येतील याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे शंभर टक्के राजकीय आंदोलन आहे. कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत असे मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महायुतीचे सरकार कांद्याच्या संदर्भात संवेदनशीलतेने काम करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यात सध्या सुरू असलेल्या इंधन खरेदीच्या गोंधळावर आणि वाढत्या मागणीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पेट्रोल आणि डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यात कुठेतरी साठेबाजी होत आहे, असे देखील निदर्शनास येत आहे. त्यासंदर्भात पुरवठा आणि गृह विभाग आता कारवाई करतील. पेट्रोल संदर्भात जो काही सरासरी वापर आहे त्यापेक्षा 23 टक्के जास्त मागणी वाढली आहे. डिझेलच्या संदर्भात ही मागणी 52 टक्क्यांनी वाढली आहे. काही ठिकाणी तर 70 टक्के जास्त पुरवठा झाला आहे. त्यामुळे साठेबाजी थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, राज्यात सध्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. मात्र, सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर पसरलेल्या अफवांमुळे नागरिक नेहमीपेक्षा 52 टक्के जास्तीची इंधन खरेदी करत आहेत. या अतिरेकी खरेदीमुळे तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. ही 52 टक्के अतिरिक्त इंधन खरेदी नेमकी कोण करतंय आणि यामध्ये कोण साठेबाजी करतंय, याचा तात्काळ शोध घेऊन पुरवठा व गृह विभागाने कडक कारवाई करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.


