नाशिकमध्ये कामानिमित्त वास्तव्यास असलेले ३७ वर्षीय शिवाजी बबन कांबळे यांचा परभणीत उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. मूळ परभणीचे असलेले कांबळे हे नाशिकमधील पिंगळे मळा येथे राहत होते. २३ एप्रिल रोजी ते आपल्या भावाकडे आले होते, तर २४ एप्रिलला कुटुंबासह साडूंच्या घरी भेट देण्यासाठी परभणीत गेले होते.
दरम्यान, दिवसभर कडक उन्हात फिरल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली. शोधाशोध केल्यानंतर ते एका खड्ड्यात पडलेल्या अवस्थेत आढळले. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या भावाने नानल पेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार उष्माघातामुळेच हा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
सध्या परभणीत तापमान ४२ अंशांच्या वर गेले असून प्रचंड उकाडा जाणवत आहे. प्रशासनाने नागरिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान गरज नसल्यास बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक काम असल्यास योग्य काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


