नांदेड, रविंद्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी ) : महापालिकेच्या कार्यालयात एखादे साधे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकाला वारंवार चकरा माराव्या लागतात, टोकन हातात असूनही प्रतीक्षेत बसावे लागते आणि काम कधी होणार याचे निश्चित उत्तर मिळत नाही, असा अनुभव अनेकदा नागरिकांच्या वाट्याला येतो. प्रशासनाच्या या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत असताना महिला बालकल्याण व शिक्षण विभागाच्या सभापती तथा नगरसेविका सदिच्छा सोनी-पाटील यांनी मात्र नागरिकांच्या तक्रारीकडे संवेदनशीलतेने पाहत थेट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागातील नागरिकांच्या अडचणी समोर आल्यानंतर सोनी-पाटील यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. नागरिकांना अनावश्यक वेळ प्रतीक्षा करावी लागू नये, टोकननंतर कामकाजासाठी निश्चित वेळ पाळली जावी आणि विभागातील कर्मचारी आपल्या जबाबदारीच्या ठिकाणी उपलब्ध असावेत, याबाबत त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या. “टोकन दिल्यानंतर नागरिकांना तीन-चार तास थांबवता कामा नये. तुम्ही वेळ द्या आणि त्या वेळेत नागरिकांचे काम पूर्ण करा. काम होत नसेल तर त्याची स्पष्ट माहिती द्या,” अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, एका नागरिकाने जन्म प्रमाणपत्रासाठी तब्बल पंधरा दिवस महापालिकेच्या फेऱ्या मारल्याचे सांगितले. अनेकदा प्रयत्न करूनही काम न झाल्याने त्यांनी सोनी-पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी संबंधित अर्जाची तातडीने दखल घेत पाठपुरावा केला आणि प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. अखेर नागरिकाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याने समाधान व्यक्त केले.
या घटनेने महापालिका प्रशासनाच्या सेवा व्यवस्थेतील काही त्रुटी पुन्हा अधोरेखित केल्या आहेत. नागरिक हा प्रशासनाच्या दारात विनंती करणारा नव्हे, तर सेवा मिळण्याचा अधिकार असलेला घटक आहे. त्यामुळे प्रमाणपत्रासारख्या मूलभूत प्रशासकीय सेवेसाठी त्याला दिवसेंदिवस कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणे ही गंभीर बाब आहे. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या तक्रारी केवळ ऐकून न घेता त्यामागील प्रशासकीय अडथळे प्रत्यक्ष समजून घेऊन पाठपुरावा करण्याची सोनी-पाटील यांची भूमिका निश्चितच लक्षवेधी ठरली आहे. जनतेच्या प्रश्नांशी असलेली बांधिलकी केवळ शब्दांत नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून दिसून आली तरच लोकप्रतिनिधित्वाला खरा अर्थ प्राप्त होतो.


